बुधवार, १० ऑगस्ट, २०११

गिरन चालू व्हती तरी
अंगावर कापड मिळालं न्हाय
गिरन जाउन जिंदगी गेली
पण घर काय मिळालं न्हाय

धरण बांधून वरसं लोटली
प्यायला पाणी मिळालं न्हाय
कालवा अंगण मोडून वाहिला
पण शेतापातुर पोचलाच न्हाय

नवीन प्रकल्प आला म्हनून
पुन्हा सरकार जिमीन घेतंय
वाचवायला गेला घर म्हणून
पोराचा माझ्या जीव घेतंय...

सोमवार, ८ ऑगस्ट, २०११

वाट पाहतो तुझी मी
अन् तो चंद्रही नभी झुरतो..
स्वप्नात तुझ्या मी असता
चंद्रही तयातच उतरतो...

तुझ्या येण्याला जेव्हा सखे
थोडासाही उशीर होतो
मन माझे होते बावरे
चंद्रही ढगाआड लपतो...

तुझ्या येण्याने सृष्टी खुलते.
चंद्रही उजळून जातो...
तू आल्यावर मला उमजते
चंद्र तुझ्याच रूपावर जगतो..

रविवार, १७ जुलै, २०११

ख्वाब तो कई देख रखें हैं हमनें|
लब्ज तो कई लिख रखे हैं हमनें|
बस इंतज़ार हैं उन लम्हो का,
जब हम जी सकेंगे उन ख्वाबोंको|
इंतज़ार हैं उन्ही लोगों का,
जिनसे, कह सकेंगे इन्ही लब्जोंको|
ना जाने वो लम्हा वो लोग कब आएँगे|
हमारे दिल का ये बोझ हल्का करने,
के हम देख सके नये ख्वाबों को,
और लिख सके नये लब्जोंको|

विनायक बेलोसे
ज़िंदगी तो चलती रहेगी, हमें चलाने की ज़रूरत हैं|
ज़िंदगी के साथ आगे बढ़ने की ज़रूरत हैं|

कुछ भी हो कहीं थमे न ये ज़िंदगी,
ये ख़याल हमेशा ज़िंदा रखने की ज़रूरत हैं|

हर पल छाँव नसीब नहीं होगी,
कभी धूप में भी चलने की ज़रूरत हैं|

रास्ते और मंज़िले तो आते जाते रहेंगे,
बस हमें ज़िंदगी जीने की ज़रूरत हैं|
संध्याकाळ... गर्दी...
धावपळ.. वाट शोधण्याची...
थोडी खरेदी... थोड्याश्या गप्पा...
थोडीशी घाई... घरी पोचण्याची...
रोजचाच रस्ता... तोच कोपरा.. .
तीच वेळ... परतीच्या प्रवासाची...
नेहमीचेच विचार... आजच्या दिवसाचे..
तीच काळजी.. येणार्‍या उद्याची...
सारे काही अगदी तेच... रोजचे..
अन् अचानक एक आवाज...
कानठळ्या बसणारा... धडाम्...
अन् मग... सुन्न...
डोळे दिपवणारा लोळ आगीचा..
सारे काही छिन्न विछिन्न..
उध्वस्त झालेला कोपरा... तोच आधीचा..
"वाचवा... धावा.. पकडा... उचला..."
त्याच हाका... तेच आवाज...
चिखल सारा... सार्‍या चौकभर...
रक्ताचा.. .मांसाचा... पाण्याचा..
कित्येक तुकडे... गाड्यांचे... माणसांचे..
अगणित प्रश्न... जिवंत राहिलेल्या मनांचे...
का? कोण? कधिपर्यन्त?
उत्तर... माहीत नाही....

बुधवार, १३ जुलै, २०११

१२ जुलै १९६१...

१२ जुलै १९६१... पानशेतच्या पुरानंतर पुण्यात काहीश्या अशयाच भावना असतील.. कित्येक मनांमध्ये..

शांतता... भयाण शांतता..
सारे काही उद्ध्वस्त झालेले..
चिखल सगळीकडे..
दगड मातीचा... अन् भावनांचा..
कित्येक मने.. भेदरलेली
सारे जीवन वाहून जाताना पाहिलेली..
क्षणात शून्य अनुभवलेली..
शून्य.. यातूनच आता सारे उभे व्हायचे होते..
करायचे होते..
इतके सारे होऊनही
कुठेतरी एक ठिणगी मात्र शिल्लक होती..
सार्‍या निराशेला जाळू शकणारी...
कष्टाच्या वणव्याने पुन्हा सारे निर्माण करू शकणारी..
एकाच ठिणगी..
ही ठिणगी पेटणार हे निश्चित..
कधी? कशी? कोण पेटवणार?
इतकाच काय तो प्रश्न..

शुक्रवार, ८ जुलै, २०११

माझ्या कोकणात...

नितळ निळा किनारा..
भन्नाट वाहणारा वारा.
अंगावरी शहारा.. माझ्या कोकणात...

नारळी, पोफळीची गर्द झाडी
दगडी भिंतीची कौलारू माडी
सामोरी उभी खिल्लरी जोडी.. माझ्या कोकणात...

निवांत गाव, निवांत पार..
सारा निसर्ग हिरवा गार..
माणसांच्या मनात मायेची धार... माझ्या कोकणात...

बुधवार, ६ जुलै, २०११

तूच येशी रोज स्वप्नि परि तुला मी सांगू कसा|
आणली होती सोनफुले तझ्याचसाठी भरूनी पसा||

पाहतो तुलाच पुन्हा मी पाहतो पहिल्यांदाच जसा|
घन बरसता आनंदतो चातक दरवेळी अगदी तसा||

नाजूक तुझी ही काया जणू अप्सारेचाच तुजला वसा|
सांग सखे मग तुझ्या कोमल तनुस मी स्पर्शू कसा||
सुगंध चढे रातीला अन्
चंद्र होई वेडापिसा
तो सुंगंध तुझा वा
रातराणीचा सांग सखे..
ओळखावा कसा?

प्रकाश रूपेरी पडतो अन्
लागते सृष्टी उजळाया
तो चंद्र चमकतो वा
उजळवते सृष्टी, सांग सखे,
तुझी काया?

चंद्र, तारे, अवकाश, धरती
मग भरून जाती
मदहोश अशा स्वप्नाने
तो भास असे वा
होतसे ही जादू, सांग सखे,
तुझ्या असण्याने?

रविवार, ३ जुलै, २०११

पाउस ज्येष्ठातला....
जोशात सुरूवात करणारा...
वैशाख वणव्यातल्या
मातीस भिजवणारा...
मृदगंधाच्या साथीने
सार्‍या सृष्टीस मोहवणारा...
पाउस ज्येष्ठातला...
जोशात येणारा..
अन् पुन्हा हळूच दडून बसणारा...

जखमा

हृदयास जखमा जाहल्या अपार तरीही अजुनी जिवंत आहे|
मरण मागता तेही मिळेना इतकीच काय ती खंत आहे|

जखम कितीही खोल पोचली तरीही अंत सापडेना|
जखम भरण्याचा प्रयत्न करण्या औषधसुद्धा सापडेना|

ठरवले जेव्हा जखमा पाळण्याचे जखम करण्या कोणी मिळेना|
होत्या ज्या जखमा त्याही गेल्या नाव्यास मात्र मुहूर्त मिळेना|
पाउस एकदाच येऊन जातो
धरती भिजवून जातो..
यंदा सोनं उगवणार
अशी आशा देऊन जातो...

मग शेतकरी कष्ट करतो,
धरणीमायचा ऊर फाडतो...
तिच्या काळजात अंकुरण्यासाठी
पुन्हा नवं बीज पेरतो...
अन् येऊन गेलेल्या पावसाची
परत येण्याची वाट बघतो..

पाउस काही येत नाही..
अंकुर काही फुटत नाही.
दरवर्षी होणारी निराशा
याही वर्षी चुकत नाही...

मग मात्र शेतकरी
पुन्हा एकदा हतबल होतो...
कुणाला काळ उचलून नेतो..
तर कोणी स्वतःच त्याच्या हवाली होतो...

एकमेकांच्या प्रेमात

ती म्हणते...
तू विसरशील मला..
अन् मी मात्र
केवळ तिच्याच स्वप्नात हरवलेला...

ती विचारते...
मी नसते तेव्हा तुला मी आठवते?
अन् मी मात्र
पूर्णवेळ केवळ तीचाच विचारात पडून असतो...

मग ती पाहत राहते माझ्याकडे...
एक टक...
अन् त्याच वेळी मी...
तिच्या डोळ्यात सारं जग पाहत असतो...

असाच काहीसा प्रसंग
प्रत्येक भेटीत घडतो..
अन् आम्ही दोघेही एकमेकांच्या
अगदी रोज प्रेमात पडतो...

गुरुवार, ३० जून, २०११

वो देखते हैं दुनिया हमारी आँखोंसे'
और हम दुनिया में उन्हिको देखते हैं|
वो शरमाके पलके झुका लेते हैं,
और हम उनकी आँखोंमें देखने को तरसते हैं|

सोमवार, २७ जून, २०११

"नशीब माझे , ती भेटली तरी...
वाटले पुन्हा जन्म घ्यावा लागेल...
पण आता नाही घ्यावा लागणार...
याच दिवसाची तर वाट पाहत होतो मी..
चला सुटलो एकदाचा मोक्ष तरी लाभेल आता...
...
अस्मानीचा सूर्य तो...
अन् रातीचा चंद्र तू...

मराठमोळा अभिमान तू...
हिंदूंचा स्वाभिमान तू..

मराठ्यांचा गर्व तू..
स्वराज्याचे पर्व तू...

मावळ्याची माय तू...
छत्रपती शिवराय तू...

छत्रपती शिवप्रभूंच्या जन्मतिथीनिमित्त शंखपाळ कुलोत्पन्न विश्वनाथ पुत्र विनायकाचा त्रिवार मुजरा...

कविता का करायची?

कविता करायची नसते
जिंकण्यासाठी
किंवा हरण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणाला काही सांगण्यासाठी,
किंवा काही विचारण्यासाठी,

कविता करायची नसते
कोणालाही मार्ग दाखवण्यासाठी
किंवा मार्ग शोधण्यासाठी

कविता करायची असते
ती केवळ व्यक्त होण्यासाठी
मनातले भाव मूर्त रूपात आणण्यासाठी..


वाचणार्‍याने ठरवायचे असते
कवितेत काही आहे की नाही
त्यानेच ठरवायचे असते
त्यातून काही घ्यायचे की नाही

पण, वाचकाने काहीही ठरवले
तरी एक मात्र विसरायचा नाही
कविता कशी का असेना,
व्यक्त होणे थांबवायचं नाही...

गुरुवार, २३ जून, २०११

स्पर्श तुझा वा कल्पना
दोन्ही शहारुन जातात मला..
वार्‍याची झुळुक अन् सूर्यकिरणे
जणू बहरूण जातात फुला...

क्षण प्रत्येक भेटीतला तुझ्या
अन् गंध तुझ्या मिठीतला
जणू पावसात भिजलेल्या
दरवळणार्या मातीतला

अश्या तुझ्या प्रत्येक अदेवर
मी रोजच भाळत राहतो..
तुझ्या सोबतीतल्या क्षणाचे
मी प्रत्येक पान चाळत असतो...

बुधवार, २२ जून, २०११

एकाच नजरेत तुझ्या मी इतका घायाळ होतो
एकाच ठिणगीचा जणू क्षणात वणवा होतो

पाहताच तुला मी ना जाणे कोठे हरवून जातो
एकाच क्षणात मी सार्‍या दुनियेत फिरून येतो

तू नसताना तर केवळ मी तुलाच आठवतो
प्रत्येक आठवणीचा मग पाठलाग करतो

तू येशील पुन्हा तेव्हा मी काय देऊ तुजला
याच विचारामध्ये मी कित्येक जन्म जगतो

भेट तुझी अन् माझी

आठवण तुझी मज येते अन् हरवून पुन्हा मी जातो
क्षण सोबत घालवलेला जणू परतून पुन्हा मग येतो

एकही दिवस नसे जेव्हा आठवण तुझी येत नाही
विचार तुझ्या नसण्याचा क्षणाचीही उसंत देत नाही

प्रत्येक क्षण तुझ्या सोबतचा मज घेऊन जातो मागे
भूतकाळ पुन्हा जागा होतो जोडतो तुझ्याशी धागे

जखम तुझ्या प्रेमाची कधीच भरणार नाही
भेट तुझी अन् माझी मी कधीच विसरणार नाही