शुक्रवार, २५ जानेवारी, २०१३

तुझ्या केसातून डोकावणारी
सांजेची सोनेरी किरणे....
अधुन मधून तुझे
केसांतून हात फिरवणे...

समोर वाहणारी निवांत
चकाकणारी नदी...
तिच्या प्रवाहातूनही
तुझ्याच प्रतिबिंबाची गर्दी...

रोज सूर्य मावळताना
मी अशीच स्वप्ने पाहतो...
खरी होतील न होतील
हे तुझ्यावर मी सोडतो...

- मनस्वी... 

गुरुवार, २० डिसेंबर, २०१२

पुतळ्यांचे राजकारण...


देव... देणारा तो देव... पण तो मूलतः निर्गुण.. निराकार... कारण, ती एक मानसिक शक्ति वाढवणारी चेतना आहे... इतकंच...
ही शक्ति प्रथमपासूनच मानवाला खूप काही देत आलीय.... आणि मानवानेही त्याचा पुरेपूर फायदा करून मानवजातीचा विकास, प्रचार, प्रसार केलाय.. आणि याच सर्व गोष्टींसाठी त्या नैसर्गिक चेतनाशक्तीचे... पर्यायाने देवाचे आभार मानावे म्हणून म्हणून मनुष्याने त्या शक्तिला मूर्त रूप द्यायला सुरूवात केली..

हेच मूर्त रूप म्हणजे मूर्त्या देवाचे (त्या चेतनाशक्तीचे) सगुण साकार रूप मानले गेले.. मग, पुढे ज्या ज्या शक्तींमुळे मानवाला फायदा झाला त्यांचे स्वतःच्या कल्पनाशक्तीनुसार एक एक रूप तयार होऊ लागले.. याच सगुण रूपावर अभिषेक, पूजा असे काही उपचार करून मानवाने पुढे आपली देवांप्रतीची श्रद्धा व्यक्त केली..

पुराणकाळापासून ही प्रथा चालत आली आणि नंतर आपल्याला देणारा तो देव या नात्याने अनेक राजे, महाराजे, युगपुरूष यांची त्यांच्या जिवंतपाणी आणि त्यांच्या मृत्यूनंतर अशीच पूजा बांधण्याची प्रताच पडली.. राम, कृष्ण, शिव, विष्णू, खंडोबा, विट्ठल हे सारे त्याच परंपारेतून आले असावेत (असे मला वाटते).

त्याचबरोबर, संत मंडळींनीसुद्धा या पंक्तीत बर्‍याच प्रमाणात स्थान मिळविले. आणि हळूहळू प्रत्येक समाजात असे युगपुरूष देवाचे प्रातिरूप मानले जाऊ लागले. त्यांची पूजाअर्चा होऊ लागली. शिवरायांनासुद्धा याच पंक्तीत स्थान मिळाले. अर्थात, या सर्वांनी समाजासाठी केलेले कार्य महान होते आणि आहेच, यात काहीही शंका नाही.
आणि याच परंपारेतून पुढे सार्वजनिकरित्या या सर्व 'देवांना' सन्मान मिळावा, म्हणून देवळांची प्रथा पडली असावी. त्याचप्रमाणे युग-पुरुषांसाठी त्यांचे पुतळे, स्मारके बंधने सुरू झाले. आणि हेच पुतळे, स्मारके त्या त्या समाजाच्या अस्मितेची केन्द्र म्हणून उदयास येऊ लागली. याचाच परिणाम म्हणून आज प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोठ्या व्यक्तिंची, युग-पुरुषांची, नेत्यांची स्मारके, पुतळे बांधले जाऊ लागले.

सुरुवातीला हे प्रमाण कमी होते, पण जसजसे गावांमध्ये 'विकासाचे' वारे वाहू लागले, गावांमध्ये पैसे येऊ लागले तसे पुतळे, स्मारके वाढु लागले आणि त्यांचे आकारसुद्धा. हे पुतळे बांधून आपल्या पूर्वजांचा, महापुरुषांचा, युग-पुरूष / स्त्रियांचा यठोचीत सन्मान होत असल्याची भावना लोकांमध्ये वाढत गेली आणि ती तशीच राहील अशी व्यवस्थाही करण्यात आली.

इथेच राजकारणी लोकांनी बाजी मारली. लोकांची श्रद्धा असलेल्या व्यक्तिंची स्मारके बांधून देणे, हे गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, राज्यातील, देशातील इतर कामे करण्याहून अगदी सोपे काम असते. विकासकामे करण्यात बराच वेळ, पैसा खर्च होतो. अनेक लोकांचे हितसंबंध जपून ती कामे पूर्णत्वास नेणे खूपच जिकीरीचे काम असते. त्यापेक्षा गावाचा एकूण आवाका आणि तिथल्या समाजाचे स्वरूप पाहून एखादे स्मारक करणे सोपे.

त्यातूनही माणूस हा मुख्यतः भावनाप्रधान असतो. कोणत्याही गोष्टीवर मनुष्याची प्रथम प्रतिक्रिया ही नेहमी भावनाप्रधानच असते.
नंतर मग त्यावर विचार करून ती योग्य-अयोग्य ठरते. आणि विचार करून एखाद्या गोष्टीबद्दल बोलणे, त्यावर प्रतिक्रिया देणे, यासाठी त्या प्रत्येक गोष्टीचा, घटनेचा अभ्यास असावा लागतो. आणि तो प्रत्येकाला करणे शक्य होईलच असे नसते.. आणि म्हणूंच एकूण समाजाचा विचार करता, प्रत्येक समाज, 'समाज' म्हणून, भावनेच्या आहारी जाऊन निर्णय घेण्याचीच शक्यता जास्त असते.
म्हणूनच कोणीही कितीही नाकारले, तरीही आपल्या महापुरुषांचा, नेत्यांचा, श्रद्धास्थानांचा झालेला मान-अपमान यांवर मनुष्य आपले मत ठरवत असतो. जो आपल्या श्रद्धास्थानांना यथोचित मान-सन्मान देईल, तो आपल्या जवळचा वाटू लागतो. आणि याची परिणती जात, धर्म, समाज, श्रद्धा या भावनांवर आधारित राजकारणात होते. आणि एका समाजाने यात उडी घेतली की हळूहळू नकळतच, इच्छे-अनीच्छेने प्रत्येक समाज यात ओढला जातो. त्यातून विटंबना, दंगली, पूजा-अर्चा, उत्सव या सर्व गोष्टींतून या सर्व समाजांचे ध्रुवीकरण केले जाते. आणि त्यातूनच सर्व राजकारण खेळले जाते. अर्थात काहीवेळा या राजकारणाचा त्या त्या समाजास तातपुरता उपयोग होतोही. पण, एक संपूर्ण मानवसमाज म्हणून जर या गोष्टीकडे पाहायचे असेल, तर सर्वांचेच नुकसान होणे हेच या राजकारणाचे भवितव्य ठरलेले असते.

सध्या महाराष्ट्रात अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झालीय. (देशात ती काही वेगळी नाहीच म्हणा). प्रत्येक समाजाने एकेका महा-पुरुषाचा त्यांच्या 'दैवत्वाचा' कैवार घेतला असावा असे काहीसे चित्र आहे. आणि म्हणूनच केवळ त्यांचे पुतळे बांधून आपल्या समाजाचा काहीतरी मोठा विजय होणार आहे, असा समाज सर्वच समाजांनी करून घेतलाय. म्हणूनच, एकीकडे पाण्याविणा लोक मारत असताना, गुरांना चारा नसताना, शेतकर्यांचे, सामान्य नागरिकांचे हाल होत असताना केवळ ही स्मारकेच जणू सर्वांना तार्णार आहेत, अश्या आविर्भावात सर्वच नेते लढताना दिसत आहेत. आणि दुर्दैव असे की, दुष्काळ, गरीबी अश्या गंभीर परिस्थितीमध्ये असलेल्या भागातच सर्वात जास्त लोक या स्मारकांसाठी झटताना दिसत आहेत. आणि याच अर्थाची आश्वासने देणार्‍या लोकांना जनता मतदान करत आहे.

एक-एक स्मारक बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्याची आश्वासने विविध नेत्यांकडून मिळत असताना, त्यापेक्षा आमच्या पोटा-पाण्याचे प्रश्न सोडवा, असे म्हणणारे लोक कमी आहेत. हीच मोठी शोकांतिका आहे. आणखी किती काळ लोक अश्या आश्वासानांना भूलणार आहेत याचे उत्तर काळच देईल हे निश्चित. परंतु, सध्य-परिस्थितीत महाराष्ट्रात जे चालू आहे त्यावर एकच उपाय दिसतोय, तो म्हणजे कोणीतरी जाब विचारणे. समाजाला या सर्व गोष्टी समजावून सांगणे, आणि समाजाकडून या गोष्टीला विरोध करवून घेणे. यापैकी प्रश्न विचाराने, आणि समाजाला जास्तीत जास्त समजवण्याचा प्रयत्न करणे हेच आपल्या हाती आहे. आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे, असे मला वाटते.

- मनस्वी ((विनायक विश्वनाथ बेलोसे)
२० डिसेंबर २०१२

गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२

पावसाची गोष्ट


पावसाची गोष्ट पाउस
रात्रभर सांगत राहिला..
अन् घरामागचा डोह
दुथडी भरून वाहत राहिला.. (चं. गो.)

पाउस कधी हसत होता..
मेघांतून गडगडाट करून..
मधूनच रडू लागायचा...
मुसळधार पडून...

पावसाला भानच नव्हतं..
डोह, कधीचाच गेलाय भरून..
पावसासाठी, मेघ ठेवून...
त्याचं दुःख भरून घेतोय..

डोह मात्र दुःख घेऊनही
केवळ सुख वाटत होता..
भेगाळलेल्या धरतीवरल्या
पाटाकडे वाहत होता...
__________________-मनस्वी.. (प्रेरणा - आदरणीय चं. गो.)
१४:३५ - ३० ऑगस्ट २०१२

अचानक ती म्हटली मला..
"बरेच दिवस झाले...
तू असं छान काही लिहिलं नाहीस?
बरेच दिवस झाले...
शब्दांतून प्रेम व्यक्त केलं नाहीस?"

तिला म्हटलं...
"अगं सखे, वेळच कुठे मिळतो मला..
तुला न्याहाळत बसण्यातून?
तू समोर नसलीस,
की तुझी आठवणीत रमण्यातून...?"

तर म्हणाली...
"असं कसं?
पुर्वी तर करायचास की कविता..
अगदी माझ्या समोर बसून..
सुंदर शब्द गुंफायचास...
अन् माळायचास... त्यांचा गजरा करून.."

मी म्हटलो...
"आताही मी तेच करतोय...
पण तुलाच कळत नाहीये..
कविताच तर ऐकवतोय...
पण तुझंच लक्ष नाहीये..."

तेव्हा मात्र सखी, थोडी विचारात पडली..
अन् सारं उमगलं... तेव्हा पुन्हा गोड लाजली...

कुछ तो...


इस जहाँ में अभी कितनीही बातें
हुईही नही हैं..
और हम हैं के कहते हैं,
हमने सबकुछ सिख लिया हैं...
अभी तो न जाने
कितनी बातोंसे अंजान हैं हम
और हम कहते हैं
हमने सारा जहाँ देख लिया हैं...
अभी तो कयामत
देखीभी नही हैं हमने,
मगर, हम कहते हैं,
हमने तैरना सिख लिया हैं... .
जिस पल हम ये मानेंगे,
हम सिर्फ़ एक कतरा हैं इस जहाँका,
तब हम कह सकेंगे,
हमने कुछ तो जान लिया हैं...
________________________-मनस्वी
१२:३९ - ३० अगस्त २०१२

गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१२

अंत - उगम


मावळला जरी सूर्य...
पुन्हा फिरून तो येतो ...
जरी झाली राख फिनिक्सची...
त्यातूनही जन्म तो घेतो...

गाळुन पडलेल्या फळातून
पुन्हा, नवा वृक्ष अंकुरतो..
नदीचा प्रवास कसाही होवो..
अंती, सागराशीच संगम होतो..

प्रत्येक गोष्ट जी जन्म घेते..
तिचा पुन्हा अंत होतो..
सृष्टीच्या अंतातूनही पुन्हा
नव्या सृष्टीचा उगम होतो...

सोमवार, २ जुलै, २०१२


चार पावलं मागं यावं..
कुण्यातरी आपल्यांसाठी..
अन् मग जाणीव व्हावी..
आपण एकटेच मागे पडल्याची..

अश्यावेळी आपण पुन्हा
त्यांना गाठण्याची धडपड करतो..
परंतु, कित्येकवेळा शेवटी..
आपण.. काही क्षणांनी मागेच राहतो..

समजत नाही.. उडी घ्यावी सरळ..
पुढे जाण्यासाठी..
की वाट पाहावी..
कोणीतरी.. मागे वळून पाहण्याची..

पुढे जाण्याच्या प्रयत्नात
कधी आपण पुढेच निघून जातो..
काहीच केलं नाही..
तर कायमचे मागे राहतो..

नात्यांच्या या खेळात
आपण इतके गुंतून जातो..
की हा गुंता सोडवण्याआधीच..
आपला.. वेळ संपतो..


रात्र... अंधार...
किरर्र.. घनदाट..
त्यातून जाणारी
एक नागमोडी वाट..

धुकंच धुकं सर्वत्र..
ना दिशा.. ना वेळ..
कशाचाच जमेना..
कशाशीही मेळ....

आसपास कोणाची
चाहूल तेवढी येते..
पण, सोबत केवळ..
भीतीच सोडून जाते..

अचानक एक किंकाळी..
मग पुन्हा.. शांतता...
हृदयात वाढणारी धडधड..
अन् मेंदूत सुन्नता..

पुन्हा पुन्हा एकच विचार..
पुढे नक्की होणार काय...
अन् तेवढ्यात जाणवतो..
कशात तरी अडकलेला पाय...

हाच आहे तो शेवट..
खात्री पटलेली असते..
या वेळची किंकाळी..
आपल्याच आतून आलेली असते..


एक क्षण... शेवटचा..
मृत्यू येण्याआधीचा..
प्रत्येकाच्या आयुष्यात येऊनही..
कोणालाच ठाऊक नसलेला..

कधी तो क्षण कधी येईल..
याची चिंताच कोणाही नसते
कधी केवळ.. त्याच्याच येण्याची..
वाट पाहण्याची ओढ वाटते..

कोणीही कसंही वागत राहो..
तो क्षण तर येणारच असतो..
आपल्या हाती केवळ..
त्या क्षणापर्यंतच वेळ असतो..


आजचा सूर्य मावळेल..
पुन्हा कधीही न उगवण्यासाठी..
आज रात्र होईल...
पुन्हा कधीही न संपण्यासाठी..

उगवलाच उद्याचा दिवस..
तर, तो केवळ भास असेल..
सारे काही तसेच असेल..
तरीही एक पोकळी असेल..

कोणाला बहुदा समजेलही..
पोकळी झालेली जाणवेलही..
पण त्यामागचे कारण काय..
हे शोधायचाही वेळ नसेल..

पुन्हा काही नवीन घडेल..
पोकळी नकळत भरून जाईल..
जुने मात्र पुन्हा एकदा..
नेहमीप्रमाणे.. विस्मरणात जाईल..

शब्दांना काय...
त्यांना कोणीतरी हवंच असतं...
त्यांना व्यक्त करणारं..
स्वतःच्या मनातल्या भावना..
त्यांच्या सोबतीनं मांडणारं...

आपण फक्त स्वतःहून
चार पावलं पुढं व्हावं..
शब्द निवडतातच आपल्याला..
मग आपण त्यांना घेऊन..
त्यांच्याशी खेळून...
असंच पुढे चालत जावं. .

शब्दांना मग आठवण राहते..
आपल्या सोबतीतल्या गमतीची... .
मग ते शोधत राहतात..
आपल्याला..
बनवायला.. वाट.. व्यक्त होण्याची...

मंगळवार, २६ जून, २०१२

तो आला आला म्हणून 
सगळे आनंदून गेले होते..
आता सारी दुःखे धुवून जातील
अशी अशा बाळगून होते...

तो आला खरा, पण मग 
अचानक गायब झाला कुठेसा...
त्यानेच अशी पाठ फिरवली तर
कुणावर ठेवायचा भरोसा?

तुला हवं ते देतो...
खोटं नाही अगदी खरे...
पण आता त्रास नको देऊस...
पावसा, एकदाचा आता पड रे...
________________________-मनस्व
26 jun 2012 - 21:23

मंगळवार, ५ जून, २०१२

तो आला.. अन्


तो आला..
थंडगार वार्‍यावर
मृद्गंध स्वार झाला..
भेगाळलेल्या धरेसाठी
कृष्णमेघ जलधार झाला..

तो आला.. अन्
पाणावलेल्या डोळ्यांमधले
खारे पाणी मधुर झाले..
उन्हात जळुनी कोमेजलेले
मन पुन्हा मोहरुन आले..


तो आला.. अन्
सारी सृष्टी
पुन्हा नव्याने खुलू लागली..
आनंदाच्या महापुराने
दुःखे सारी धुवून गेली..

सोमवार, ४ जून, २०१२

पाउस... वाट पहात आहे..


तिला तो आवडला होता.. 
अगदी मनापासून.. 
अडचण एकच होती.. 
तिला.. त्याच्या मनातलं
माहीत नव्हता.. 


तसे तिने बरेच प्रयत्न केले...
त्याला आपलं मन कळावं,
तिच्या त्याच्यावरचं प्रेम..
त्याला दिसावं...
पण, यश काही मिळत नव्हतं..


एक दिवस अचानक
पाउस तिच्या मदतीला आला...
दोघेच सोबत फिरत असताना..
अचानक तिचा पाय घसरला..


त्याने तिला सावरलं..
अन् दोघांची नजरानजर झाली..
तोच क्षण होता..
जेव्हा तिच्या मनातल्या प्रेमाची..
त्याला प्रचीती आली..


पाउस असाच येत असतो..
आधून मधून..
अश्याच कोण्या दोघांच्या सोबतीला..
त्यांच्या मनातलं अव्यक्त प्रेम..
एकमेकांपर्यंत पोहोचवायला..


आता पुन्हा असेच दोघे..
कुठेतरी झुरत आहेत..
पाउस कदाचित त्यांच्या
बाहेर पडण्याचीच वाट पहात आहे.. 

बुधवार, ३० मे, २०१२

सरकार


रस्त्यावरचं गरीब पोर
रोज उपाशीच झोपी जातंय
बेरोजगारीत वाढ होताना
सरकार विकासाच्या गप्पा मारतंय

पोट भरायला अन्न नाही
पाण्याविणा वासरू मरतंय
दुष्काळ सारं घेऊन गेलाय
सरकार मदतीचा प्रयत्न(?) करतंय

शहरात राहायला जागा नाही
महागाई आकाशी झेप घेतीये
सामान्याने आवाज उठवल्यावर
सरकार मात्र धमकी देतंय

अहिंसेच्या गोंडस नावाखाली
सारा विद्रोह चिरडतय
लोकशाहीच्या घोषणा फक्त
सरकार हुकुमशाही चालवतंय

मंगळवार, २९ मे, २०१२

देशहितार्थ


कोणी म्हणतो शिवराय मोठा..
कोणी म्हणे माझा भिम मोठा
कोणासाठी फुलेच महात्मा
कोणासाठी शाहूच मोठा

कोणी स्वातंत्र्यवीरास नमितो..
कोणी महात्मा गांधीस मानतो..
कोणासही मानणारा असो तो..
दुसर्‍यास मात्र तुच्छ जाणतो..

प्रत्येकाचे दैवत मोठे..
दुसरे कुणी ठावेच नाही..
अश्या परिस्थिती या भारताचे..
भाग्य उजळणे शक्यच नाही...

उपाय यावर एकच आहे..
प्रत्येकाने स्वीकारण्याचा
जात-धर्म अन् पंथ सोडूनि
देशहितार्थ विचार करण्याचा...

आता... नक्कीच येईल तो...


कैक दिवस झाले..
त्याची भेट होऊन..
आता जीव थकून गेलाय
त्याची आठवण काढून...

आता येईल तो..

त्याच्या अनुपस्थितीत
खूप काही बिघडलंय..
आता त्याचीच आस आहे..
त्याच्याविना सारं अडलंय..

आता येईल तो..

तो आला..  की सारे जग
पुन्हा प्रफुल्लित होईल...
तो आला... की सारी सृष्टी
सगळे दुःख विसरून जाईल..

आता... नक्कीच येईल तो...

शुक्रवार, २५ मे, २०१२


कधी? काय? कुठे? कसे?
प्रश्न असतात तरी किती असे?
अशी काय जादू यांची..
उत्तरातूनही नवा प्रश्न दिसे...

का कोणास ठाऊक
अचानक आकाश भरून आलं...
लख्ख ऊन पडलेलं असताना
अचानक अंधारून आलं..

जोमाचा वारा सुटला..
सारा पाचोळा उडवून गेला...
घोंघावत अवकाशी पोचला
मग अचानक शांत झाला..

मेघ जमलेले जणू चिडलेले
गडगडात मोठा झाला..
संघर्षातून त्या मेघांच्या
वीजेचा लोळ धरेवर आला..

मेघ फाडून मग जेव्हा
पाऊस बरसत उतरला
सृष्टीच्या भयाणतेतून
जणू आनंद बहरू लागला..


एक वाहता निर्झर
किरर्रता भयाण सोबती
पाचोळ्यात होई सळसळ..
अन् एक किंकाळी... अजाणती

कोणास लपवतो आडोसा
कोणाचे हास्य ते भेसूर...
वणवा लागतो कुठेसा..
आसमंती दाटला धूर...

झाकोळला तो सूर्य...
अंधार दाटूनी येतो..
उरातले चोरूनी धैर्य..
केवळ भीतीच देऊनी जातो..